अमेरिका-इराण युद्धाचा थेट बाजारपेठेवर परिणाम ; काय महागलं? काय स्वस्त झालं?

मुंबई : गेल्या चार दिवसांपासून अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद आता भारतीय बाजारपेठेवर दिसून येत आहे. विशेषतः इराणमधून होणारी आयात ठप्प झाल्याने बदामाचे दर गगनाला भिडले आहेत., तर दुसरीकडे निर्यात खंडित झाल्यामुळे बासमती तांदळाच्या किमतीत घसरण झाली आहे. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांसह ग्राहकांना देखील बसणार आहे.

इराण आणि इस्राईलच्या युद्धामुळे पिस्ता आणि बदामाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.काही महिन्यांपूर्वी 1650 रुपये प्रति किलो दराने मिळणारा इराणी पिस्ता आता थेट 2400 रुपयांवर पोहोचला आहे. तर आरोग्यासाठी लाभदायक मानला जाणारा मामरा बदामही महागाईच्या लाटेत सापडला आहे. 1800 रुपयांवरून थेट 2800 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचला आहे.
या युद्धाचा थेट परिणाम आता महाराष्ट्रातील निर्यातदारांवरही झाला आहे. जालना, मुंबई, नाशिक आणि नागपूर येथून दुबईकडे जाणारी कांदा, मका, मिरची, टोमॅटो आणि डाळिंबाची निर्यात सध्या ठप्प झाली आहे. सुमारे 370 कंटेनर मालासह दुबईमध्ये अडकून पडले आहेत. त्यामुळे याचा शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला आहे.

दुसरीकडे, इराण हा भारतीय बासमती तांदळाचा मोठा खरेदीदार मानला जातो. सध्या तेथे निर्यात थांबल्याने देशांतर्गत बाजारात तांदळाचा साठा वाढला आहे. 7100 रुपये प्रति क्विंटल असलेला दर घसरून 5900 रुपयांवर आला आहे. सुमारे 16 टक्क्यांची घसरण झाल्याने व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.परिस्थिती लवकर सुरळीत न झाल्यास बाजारातील अस्थिरता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.