अजित पवारांच्या दुर्दैवी निधनाबद्दल रोहित पवार राजकारण करतायत,अत्यंत चुकीचे…; राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याचा टोला

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावर त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी अनेक वेळा पत्रकार परिषदा घेऊन अनेक शंका आणि प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या या भूमिकेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद प्रवक्ते यांनी नाराजी व्यक्त करून टोला लगावला आहे. अजित पवारांच्या दुर्दैवी निधनाबद्दल आमदार रोहित पवार हे राजकारण करत आहेत ते अत्यंत चुकीचे आणि घृणास्पद आहे अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले,अजितदादांच्या विमान अपघाताचा सत्य बाहेर आलंच पाहिजे.त्यांच्या अपघातावरुन जे राजकारण केले जात आहे ते चूकीचे आहे. आम्ही सर्वजण म्हणजे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा नेते नाही तर महाराष्ट्राने अजितदादांसारखं नेतृत्व मुकलंय ती महाराष्ट्रातील जनता सत्य बाहेर येण्याची आतुरतेने वाट पहात आहे असेही आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रोहित पवार यांनी भेट घेतली त्यावेळी तांत्रिक अडचणींचा अभ्यास करुन गुन्हा नोंदवला जाईल असे आश्वासन देखील त्यांनी दिले होते. मात्र तरी देखील त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या अपघातावरून होणार राजकारण रोहित पवार यांनी थांबवावे असे स्पष्ट आनंद परांजपे यांनी म्हटले आहे.

दरम्यान याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे व पार्थ पवार यांच्यासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघाताचे सत्य समोर आणावे अशी मागणी देखील केली आहे. लवकरच या अपघाताच सत्य समोर येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.