आता शेतकऱ्यांची बांध कोराकोरी होणार बंद! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू झाले आहेत. असे असताना आता 1 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या भूमि अभिलेख कार्यालयात रखडलेल्या शेतजमिनीच्या मोजण्या विनानिलंब 15 दिवसांच्या आत सॅटेलाईटच्या माध्यमातून होणार आहे.

शेतकऱ्यांनी जमिनीची मोजणी केल्यानंतर झालेल्या खुणाखुणा काढून टाकणे, वारंवार जमिनीची मोजणी करावी लागणे यासह मोजणीशी निगडित वादाचे प्रकार आता थांबणार आहेत. भूमिअभिलेख अर्थात मोजणी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत रामबाण उपाय शोधला आहे.

राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. यातून जमिनीची सॅटेलाईटच्या माध्यमातून मोजणी होणार असून, यामुळे मोजणीच्या वेळेत निम्म्याने बचत होणार आहे. शेतकऱ्यांना आता अक्षांश व रेखांशासह मोजणी नकाशेही मिळणार आहेत.
मोजणीसाठी शेतकऱ्यांची होणारी त्रेधातिरपीट थांबणार आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना जमीन मोजणीच्या कामासाठी खोळंबा होणार नसून जमीन मोजणीसाठी अर्ज दिल्यानंतर किमान 15 दिवसांत ही मोजणी केली जाणार आहे. नवीन तंञज्ञानामुळे वेळेची बचत होवून काटेकोरपणे ही मोजणी होणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बांध कोराकोरी व वादविवादाला या मोजणीतून पुर्णविराम मिळणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.