काँग्रेस नेते राहुल गांधींची भिवंडी कोर्टात हजेरी ; आता पुढील सुनावणी 4 एप्रिलला

मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज भिवंडी कोर्टात हजेरी लावली. त्यांच्या विरोधात 2014 मधील मानहानी प्रकरणी खटला सुरू आहे.या प्रकरणात त्यांनी यापूर्वी दिलेले जामीनदार माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाल्याने न्यायालयात दुसरा जामीन देण्यासाठी ते भिवंडी न्यायालयात हजर झाले.यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचा जामीन राहुल गांधी यांनी दिला असून पुढील सुनावणी 4 एप्रिलला होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भिवंडी न्यायालयातील न्यायाधीश पी. एम.कोळसे यांच्या न्यायालयात राहुल गांधी उपस्थित झाले होते.यावेळी खटला दाखल करणारे आरएसएसचे राजेश कुंटे देखील न्यायालयात उपस्थित होते. 2014 च्या मानहानी खटला प्रकरणाचा दुसरा जामीन देण्यासाठी ते हजर झाले होते.जामिनीच्या बॉण्डवर सह्या व इतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ते कोणालाही न भेटता निघून गेले अशी माहिती ऍड.नारायण अय्यर यांनी दिली.
काँग्रेस नेते राहुल गांधी भिवंडी न्यायालयात येणार असल्याने काँग्रेसचे पदाधिकारी व नवनिर्वाचित नगरसेवक त्यांना भेटण्यासाठी न्यायालयात व परिसरात हजर होते. मात्र राहुल गांधी कुणालाही न भेटता राहुल गांधी भिवंडी न्यायालयातून निघून गेले.दरम्यान भारतीय कायद्याप्रमाणे जामीन घेणे आवश्यक होते. त्यानुसार राहुल गांधी यांना पुन्हा न्यायालयात सुनावणीसाठी 4 एप्रिलला यावं लागणार आहे. आता पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान प्रचार सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून हा वाद निर्माण झाला होता. महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत संघावर आरोप केल्याप्रकरणी संघाशी संबंधित राजेश कुटे यांनी त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.. या मानहानीप्रकरणी भिवंडी कोर्टात खटला सुरू आहे