राजधानी दिल्लीत खलबत ; सुनेत्रा पवारांची पंतप्रधान मोदी अन् नंतर मंत्री शाह यांच्यासोबत बैठक, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

दिल्ली : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर त्या पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल.

समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार, जय पवार, सुनील तटकरे आणि स्वत: प्रफुल्ल पटेल यांनीही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नंतर मंत्री अमित शाह यांची भेट घेतली.जवळपास ४० मिनिटे पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केली. तसंच नंतर मंत्री अमित शाह यांच्यासोबतही अर्धा तास चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंबात बैठकांचा सिलसिला सुरू होता. त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी भाजप नेतृत्वाची भेट घेतल्याने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आगामी काही दिवसांत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री उशिरा दिल्लीत येऊन भाजप नेतृत्वाची भेट घेऊन नंतर ते मुंबईला परतल्याची माहिती समोर आली होती. या सर्व घडामोडी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यातील राजकीय परिस्थिती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे.