राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, या दिवशी अर्थसंकल्प होणार सादर, कोण करणार सादर?


पुणे : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज २० दिवस चालणार आहे. ६ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला जाईल.

६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या तारखांना अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर होणारे हे पहिलेच अधिवेशन असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात २३ फेब्रुवारीपासून होत असून ते २५ मार्चपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाचे नियोजन विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले.

या अधिवेशनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे ६ मार्च रोजी सादर होणारा मुख्य अर्थसंकल्प. त्याआधी २४ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत पुरवणी मागण्या मांडणार आहेत. या संपूर्ण कालावधीत राज्याच्या विकास योजनांवर, आर्थिक धोरणांवर आणि आगामी वर्षातील खर्च-विनियोगावर सविस्तर चर्चा होणार आहे.

अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कोणतेही शासकीय कामकाज होणार नाही. २३ फेब्रुवारीला राज्यपालांच्या अभिभाषणानंतर दोन्ही सभागृहांमध्ये त्यांच्या निधनाबाबत शोकप्रस्ताव मांडला जाईल. या प्रस्तावावर प्रत्येक पक्षाचे गटनेते आणि तीन सदस्यांना बोलण्याची संधी देण्यात येणार असून पहिल्या दिवसाचे कामकाज केवळ श्रद्धांजलीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!