१०वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ‘एवढ्या’ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु, जाणून घ्या..

पुणे : देशभरातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात दोन मोठ्या सरकारी विभागांनी भरती जाहीर केल्या असून एकूण 50 हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

दरम्यान, याशिवाय अग्निवीरांसाठीही निवृत्तीपूर्वी महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. इंडियन रेल्वे ग्रुप डी भरती 2026 संदर्भातील अधिसूचना जाहीर झाली असून त्याअंतर्गत 21 हजार 997 पदे भरली जाणार आहेत. देशभरातील दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी पात्र असून अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे.


तसेच 2 मार्च 2026 ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे, तर शुल्क भरण्याची मुदत 4 मार्च 2026 पर्यंत ठेवण्यात आली आहे. तसेच अर्जात दुरुस्ती करण्यासाठी 5 ते 14 मार्चदरम्यान करेक्शन विंडो खुली राहणार आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
याचबरोबर इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवा भरती 2026 साठीही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतर्गत एकूण 28 हजार 740 पदे भरली जाणार असून महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधिक रिक्त जागा असतील.
या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून 14 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी पात्र असून निवड प्रक्रिया दहावीच्या गुणांवर आधारित असेल. ही भरती प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
अग्निवीर योजनेअंतर्गत भरती झालेल्या सैनिकांच्या पहिल्या तुकडीची निवृत्ती या वर्षाच्या अखेरीस अपेक्षित आहे. निवृत्त होणाऱ्या अग्निवीरांना पुढील सेवांमध्ये सामावून घेण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध पर्यायांचा विचार सुरू आहे. अहवालानुसार, गृह मंत्रालय या प्रकरणावर सक्रियपणे काम करत असून यासाठी वरिष्ठ निमलष्करी अधिकाऱ्यांची अंतर्गत समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
