मुंबईतील बिहार भवनाचा मुद्दा तापला!हिंमत असेल तर…; संजय राऊतांची मोठी अट

मुंबई : मुंबईत बांधण्यात येणाऱ्या ‘बिहार भवन ‘वरून महाराष्ट्र आणि बिहारमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या बिहार भवनाला आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विरोध दर्शवला आहे.त्यांनी बिहार सरकारकडे एक महत्त्वाची अट ठेवली आहे. तुम्हाला मुंबईत बिहार भवन बांधायचे असेल तर 5 एकर जागा तुम्हाला द्यावी लागेल असं सडेतोड प्रत्युत्तर त्यांनी दिल आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले, तुम्हाला मुंबईमध्ये बिहार भवन बांधायचे आहे ना मग आमचीही मागणी आहे की, ज्याप्रमाणे तुम्ही मुंबईत जागा मागत आहात, त्याचप्रमाणे बिहार सरकारने पाटण्यातील गोला रोड किंवा न्यू पाटलीपुत्र कॉलनी सारख्या मोक्याच्या ठिकाणी महाराष्ट्राला ५ ते ६ एकर जागा द्यावी. तिथे आम्ही ३० माळ्यांचे भव्य महाराष्ट्र भवन उभारु, अशी मागणी राऊतांनी केली आहे.
बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी आम्ही मुंबईत बिहार भवन बांधूनच दाखवू, कोणाच्या बापात हिंमत असेल तर रोखून दाखवा असे आव्हान केले आहे. या विधानावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. हिम्मत असेल तर तुम्हाला ती अट मान्य करावी लागेल असे राऊत यांनी म्हटले आहे.

आम्हाला बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभं करायचं आहे. महाराष्ट्रातील असंख्य लोक बिहार, पाटण्याला जातात. आम्हालाही ३० माळ्यांचे महाराष्ट्र भवन पाटण्याला उभारण्याची संधी मिळावी. ही सांस्कृतिक देवाणघेवाण आहे, असं मी मानतो. जर बिहारी बांधव आमचे असतील तर मराठी बांधवांना तुम्ही तिथे स्वीकारलं पाहिजे. फक्त मुंबईवरच आक्रमण का? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
दरम्यान या बिहार भवनावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलं असून मुंबईची अवस्था तुम्ही समजून घ्या. मुंबईत विनाकारण वातावरण बिघडेल असे वक्तव्य करु नका, असा इशारा संजय राऊतांनी केला आहे.
