शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी!! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा, अलर्ट जारी…

पुणे : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून नागरिकांना कधी थंडी तर कधी उन्हाचा अनुभव येत आहे. डिसेंबरमध्ये संपूर्ण राज्यात गारठा जाणवत असताना, नववर्षाच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला.

सध्या जानेवारी महिना असूनही मार्च-एप्रिलसारखी उष्णता जाणवत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये हवामानाबाबत चिंता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यासाठी मोठा अंदाज वर्तवला असून, येत्या काही तासांत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
विशेषतः उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता असून, शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, नंदूरबार, जळगाव, धुळे , नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार होत असून अचानक पावसाच्या सरी कोसळू शकतात. यामुळे रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राज्यातील किमान तापमानातही बदल दिसून येत आहे. धुळ्यात १०. २अंश सेल्सिअस तर निफाडमध्ये १०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दुसरीकडे ब्रह्मपुरी येथे कमाल तापमान ३३.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्यामुळे एकीकडे थंडी कमी होत असताना दुसरीकडे उष्णता वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
सतत बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. थंडी, उष्णता आणि अचानक पावसामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांत वाढ होत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीच आजार असलेल्यांनी अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.