महायुतीत ठिणगी! थेट दिल्लीतील हायकमांडकडे शिंदेंच्या शिवसेनेची तक्रार, भाजपची नाराजी….

पुणे : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या निकालानंतर महापौर पदावरून आणि सत्तावाटपावरून भाजप आणि शिंदे या दोन्ही पक्षांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. अशातच आता थेट दिल्लीत भाजपच्या नेतृत्वाकडे मुंबईतील नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाची तक्रार केली असल्याची माहिती समोर आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसान झालं आहे.शिंदे यांच्या शिवसेनेला दिलेल्या जास्त जागांमुळे भाजपच्या एकूण ‘स्ट्राइक रेट’वर परिणाम झाला असून त्यामुळे भाजपचे नुकसान झाल्याचा दावा पक्षातील स्थानिक नेत्यांनी केला आहे. यासंदर्भात राज्याच्या नेत्यांनी थेट केंद्रीय नेतृत्वाकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
मुंबईतील जागावाटपात एकनाथ शिंदे यांनी आग्रहाने घेतलेल्या जागांवर शिवसेनेची कामगिरी निराशाजनक आहे.जर भाजपने अधिक जागा लढवल्या असत्या, तर एकट्या भाजपने १०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या असत्या,” अशी स्पष्ट भूमिका मुंबईतील नेत्यांनी हायकमांडसमोर मांडली आहे.

या निवडणुकीत केवळ शिंदेंच्या आग्रहामुळे भाजपला मर्यादित जागांवर लढावे लागले, ज्याचा परिणाम युतीच्या एकूण कामगिरीवर झाला अशी तक्रार त्यांनी दिल्ली हायकंमाडाकडे केली आहे. तसेच शिंदे गटाने महापौर पदाची मागणी करत आपल्या नगरसेवकांना थेट पंचताराकीत हॉटेलमध्ये ठेवल्याने चांगली चर्चा रंगली त्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.