महाराष्ट्रात पुढील २४ तासांत हवामान बदलणार; वर्षाअखेरीस हवामान खात्याने दिला ‘हा’ मोठा इशारा…

पुणे : देशभरात तापमानाचा नीचांक नोंदवला जात आहे. उत्तर भारतात शीतलहरींमुळे प्रचंड गारठा वाढला असून हरियाणातील हिस्सारमध्ये काल 2.5°c तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील शीत लहरींचा परिणाम महाराष्ट्रावरही झाला आहे.

उत्तरेकडून वाहणारे थंड वारे हळूहळू दक्षिणेकडे सरकत असल्याने महाराष्ट्रातही मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. मात्र, येत्या 24 तासांत देशभरात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेष म्हणजे उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला असून, पश्चिमी झंजावातामुळे हवामानात लक्षणीय बदल होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. काही भागांमध्ये दाट धुक्याची चादर पसरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. धुक्यामुळे निवडक विमानतळांवरील विमान वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागू शकतो.

दरम्यान, उत्तरेकडील काही भागांमध्ये पावसामुळे तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता असली, तरी गारठा कायम राहणार आहे. पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये 30 डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम राहील, असं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे. या परिस्थितीचा परिणाम महाराष्ट्रावरही जाणवण्याची शक्यता आहे.
थंडीपासून काळजी घेण्याचा सल्ला…
महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार पुढील चार दिवसांत राज्यातील किमान तापमानात एक ते दोन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 10 अंशांच्या खाली गेले असून थंडीचा कडाका जाणवत आहे.
अहिल्यानगरमध्ये 7.7 अंश, छत्रपती संभाजीनगरमध्ये 10.5, मालेगावमध्ये 10, नाशिकमध्ये 9.8, परभणीमध्ये 9.9, साताऱ्यात 10.8 तर पुण्यात 11.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सकाळी, संध्याकाळी आणि रात्री गारठा अधिक जाणवत असून नागरिकांना थंडीपासून काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
