संतोष देशमुख प्रकरणात उज्वल निकम यांना हटवण्याची मागणी, नेमकं काय घडलं कोर्टात?

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या सुनावणीला संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. तसेच आज या सुनावणीदरम्यान नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. विशेष म्हणजे सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम हे एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत.

त्यांच्या उपस्थितीमुळे केसवर परिणाम होऊ शकतो, असा दावा करत आरोपींनी त्यांना बदलण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. या अर्जावर कायदेशीर पेच निर्माण झाल्याने न्यायालयाने ही सुनावणी दुपारपर्यंत स्थगित केली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हेंकडून यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. या सुनावणीसाठी धनंजय देशमुख उपस्थित होते. यावेळी आरोपी क्रमांक ३ ते ७ म्हणजेच सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार आणि जयराम चाटे यांच्या वतीने न्यायालयात एक अर्ज दाखल करण्यात आला.

उज्ज्वल निकम हे राजकीय पक्षाशी सक्रियपणे जोडलेले असल्याने ते या प्रकरणात निष्पक्षपातीपणे काम करू शकणार नाहीत, असा आरोप आरोपींच्या वकिलांनी केला. यावर उज्जवल निकम यांनी कायद्यात अशाप्रकारे वकील बदलण्याची कुठेही तरतूद नाही असा पलटवार युक्तिवादादरम्यान केला.
यानंतर या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आरोपी विष्णू चाटे याच्या सहभागावरुनही जोरदार युक्तिवाद झाला. विष्णू चाटेचा गुन्ह्यात कुठेही उल्लेख नाही. त्याच्याविरुद्ध पुरावे नाहीत, असा दावा बचाव पक्षाने केला.
यावर सरकारी वकिलांनी तीव्र आक्षेप घेत सांगितले की, विष्णू चाटे हा सुरुवातीपासून या गुन्ह्यात सक्रिय होता. वाल्मिक कराडचा निरोप पोहोचवणे आणि हॉटेल तिरंगामधील बैठकीत संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा असा आदेश देणे, यात त्याचा मुख्य सहभाग आहे.
