धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिलेली; अडीच कोटींची डील, मनोज जरांगेंचा सर्वात मोठा आरोप, उडाली खळबळ…

बीड : मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा खळबळजनक दावा समोर आला आहे. या कटासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जालना पोलिसांनी बीड जिल्ह्यातून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

आता या प्रकरणावर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. मनोज जरांगे यांच्या या आरोपानंतर स्थानिक वातावरण तणावग्रस्त झाले असून, पोलिसांनी या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती सुरू आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, कालच्या घडलेल्या प्रकाराबद्दल मला खरा मेसेज देणे गरजेचे होते. मी कालच मराठा समाजाला आवाहन केला आहे की, आपण शांत राहायचं आहे. मी आजही मराठा समाजाला हात जोडून आवाहन करतो की, तुम्ही शांत राहा, तुम्ही शांततेने घ्या. तुम्ही साधे साधे काम करा.

अवघड कामे करायला मी आहे. मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. मी मराठा समाजाला एक शब्द देतो की, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही. मी मेल्यानंतर तुम्हाला काय करायचे ते करा.
पण मी आहे तोपर्यंत तुम्ही सर्वांनी शांत राहायचे. आपण सगळे त्यांचे डाव उघडे पाडले आहेत. मी माझ्या समाजासाठी लढणाऱ्यासाठी खंबीर आहे. आपण बेसावध असतो तर ही घटना घडून गेली असती.
या राज्यातल्या मराठा समाजाला माझं सांगणं आहे की, जितके मराठा समाजाचे राज्यातील नेते आहे त्यांनी हा विषय गांभीर्याने घ्या. ओबीसीचे नेते, हिंदू मुस्लिमांच्या नेत्यांनी हा विषय गांभीर्याने घ्या. आज माझ्यावर वेळ आली आहे म्हणून तुम्ही मजा बघायची आणि तुमच्यावर वेळ आली की आम्ही मजा बघायची हे नको.
कोणाचं तरी ऐकून एखाद्याच्या जीवावर उठायचं. करणाऱ्या पेक्षा करवून घेणारा अधिक जबाबदार आहे. आज माझ्यावर बितली उद्या तुमच्यावरही बितू शकते. त्यामुळे ही घटना गांभीर्याने घ्या. आपल्याला असल्या वृत्तीचा नायनाट करावा लागणार, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.