प्रतीक्षा संपली! डिसेंबर महिन्यात 1700 तलाठ्यांची भरती प्रक्रिया, तयारीला लागा

पुणे : महाराष्ट्रातील तलाठी भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या हजारो उमेदवारांची प्रतीक्षा अखेर संपणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यात गेल्या काही महिन्यापासून तलाठ्यांची 1700 पदे रिक्त होती. ही पदे भरण्यासाठी शासनाने प्रक्रिया सुरू केली आहे., तलाठी भरतीची हालचाल पुन्हा सुरू झाली असून डिसेंबर महिन्यात भरती प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.

सध्या महसूल विभागात तलाठ्यांच्या जागांची मोठ्या प्रमाणात रिक्तता आहे. राज्यात सुमारे १७०० हून अधिक पदे रिक्त असून, यामुळे विद्यमान तलाठ्यांवर कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे. एका तलाठ्याकडे सध्या तीन ते चार गावांचा कारभार असतो. त्यामुळे नागरिकांच्या जमीन, महसूल आणि विविध कागदपत्रांशी संबंधित कामांना मोठा विलंब होत आहे. त्यामुळे आता लवकरच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत तलाठी भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती समोर येऊ शकते.या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या भरतीला गती देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. डिसेंबरअखेरीस ही भरती प्रक्रिया सुरू होण्याची दाट शक्यता असल्याचे महसूल विभागातील सूत्रांनी सांगितले. नव्या भरतीमुळे विभागातील कामकाज सुलभ होईल, तसेच नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, महसूल विभागातील पात्र सेवकांसाठी या भरतीत राखीव जागा ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांना याचा थेट लाभ मिळेल. तसेच, ‘पेसा’ क्षेत्रातील गावांमध्ये कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी कंत्राटी तलाठ्यांची नेमणूक करण्याचाही विचार सुरू आहे.
