बीडमध्ये व्हायरल बॅनरने खळबळ ; थोडीशी मदत अण्णांसाठी…. आपल्या स्वाभिमानासाठी…..; मास्टरमाईड वाल्मीक कराडच्या नावानं मागितला जातोय आर्थिक निधी?

बीड : बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी,वाल्मिक कराड याच्या नावाने सध्या सोशल मीडियावर आर्थिक निधी गोळा करण्यासाठी बॅनर व्हायरल होत आहेत. वाल्मिक (अण्णा) कराड संघटना मित्र मंडळ मजबूत करण्यासाठी तसेच सोशल मीडियावर वाल्मिक कराडचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी आपले आर्थिक सहाय्य फार महत्त्वाचे आहे. फुल ना फुलाची पाकळी दान करून मदत करा. तेव्हाच अण्णा आपल्यामध्ये एक दिवस येतील.. थोडीशी मदत.. आण्णासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी अशा मजकुराचे हे बॅनर सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

वाल्मिक कराड हा मस्साजोगचे सरपंच संतोष देखमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी असून तो सध्या तुरुंगात आहे. अशा आरोपीच्या नावाने पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासाठी निधी संकलन केले जात असल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. धक्कादायक म्हणजे व्हायरल बॅनरवर क्युआर कोड देखील देण्यात आला आहे. या बॅनरद्वारे वाल्मीक कराडसाठी निधी गोळा करण्याचे उघड आवाहन करण्यात आले आहे. वाल्मीक (अण्णा) कराड संघटना मित्र मंडळ मजबूत करण्यासाठी तसेच सोशल मीडियावरही वाल्मीक अण्णांचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी आपले आर्थिक सहाय्य फार महत्त्वाचे आहे. फुल ना फुलाची पाकळी दान करून मदत करा. तेव्हाच अण्णा आपल्यामध्ये एक दिवस येतील… थोडीशी मदत… अण्णासाठी… आपल्या स्वाभिमानासाठी, असा मजूकर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. दरम्यान, या बॅनरसोबतच एक यूपीआय पेमेंट अॅपचा क्यूआर कोड देखील देण्यात आला आहे. हा क्यूआर कोड संदीप तांदळे नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्याचा आहे. बॅनरवरील मजकूर, त्यातील भावनिक आवाहन आणि आरोपीच्या नावावरून निधी मागण्याचा प्रकार यामुळे प्रशासनात आणि सामान्य जनतेत खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे या बॅनर वर भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपिनाथ मुंडे, भाजपच्या नेत्या तथा राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते धनंजय मुंडे यांचे फोटो झळकले आहेत. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासाठी हा निधी गोळा करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीच्या नावाने झकलेल्या बॅनर मुळे बीडमध्ये चाललय काय? प्रशासनाचा धाक संपला की काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
