‘पिंजरा’ सिनेमा फुलवणारा चेहरा काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन, 94 वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील ‘पिंजरा’ हा एक आयकॉनिक आणि अविस्मरणीय चित्रपट मानला जातो. हा अजरामर मराठी सिनेमा गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम याचं निधन झालं आहे. वयाच्या 94 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा राजकमल स्टुडिओमध्ये संध्या याचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

संध्या शांताराम यांचा जन्म 13 सप्टेंबर 1938 साली झाला. त्यांचे मूळ नाव विजया देशमुख असे आहे.1959 मध्ये प्रदर्शित झालेल्या व्ही. शांताराम यांच्या ‘नवरंग’ या चित्रपटातून अभिनेत्री संध्या शांताराम यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांना चकित केले. “अरे जा रे हट नटखट” हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे आजही तेवढेच लोकप्रिय आहे या गाण्यासाठी त्यांनी खास शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यावेळी कोणतेही नृत्यदिग्दर्शक नसल्याने, गाण्यात दिसणाऱ्या सर्व स्टेप्स संध्या यांनी स्वतः किंवा दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी तयार केल्या होत्या.’ पिंजरा ‘या चित्रपटात आपल्या देखण्या व्यक्तिमत्त्वाने आणि अप्रतिम नृत्यकौशल्याने संध्या शांताराम यांनी प्रेक्षकांची मने जिकंली होती.
भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी त्यांच्या सोशल मिडीया एक्स वरती पोस्ट करुन याबाबत माहिती शेअर केली. त्यांनी लिहिले की, भावपूर्ण श्रद्धांजली ! ‘पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मानावर एक वेगळी छाप पाडली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’ आणि विशेषत: ‘पिंजरा’ चित्रपटामधील त्यांची अजरामर भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ! अभिनेत्रीच्या निधनाने इंडस्ट्रीतही एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
