एकनाथ शिंदेंचा ‘तो’ आदेश अन् प्रताप सरनाईकांकडून एसटी प्रवाशांसाठी मोठा दिलासा, तिकीट दराबाबत नेमकं काय ठरलं?

पुणे : एसटी महामंडळाने दिवाळीसाठी हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ही भाडेवाढ रद्द करण्यात आली असून राज्यातील पूरस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निर्देश दिले होते.

तसेच यामुळे दिवाळीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून महामंडळाला यातून मिळणारे ३० कोटी रुपयांचे उत्पन्न सोडावं लागणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही १० टक्के हंगामी भाडेवाढ जाहीर करण्यात आली होती.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात, एसटी प्रशासनाने दिवाळीसाठी केलेली हंगामी १० टक्के बस भाडेदरवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, या निर्णयामुळे दिवाळीत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना याबाबत निर्देश दिले होते.

राज्य परिवहन प्राधिकरणाकडून एसटी महामंडळाला ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यानुसार, काही दिवसांपूर्वीच एसटी महामंडळाने दर वर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सणासाठी १० टक्के हंगामी भाडेवाढ जाहीर केली होती. या निर्णयानुसार १५ ऑक्टोबरपासून ५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत या कालावधीत ही भाडेवाढ लागू होणार होती.
परंतु, अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले. एसटी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात प्रवासी संख्या लक्षात घेत १० टक्के भाडेवाढ करत असते.
महामंडळाला यातून साधारण अतिरिक्त ३० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. परंतु यंदा राज्यात निर्माण झालेली पूरस्थिती लक्षात घेऊन भाडेवाढीचा मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.