अजित पवारांचा खडकवासला येथील ‘जनसंवाद’ कार्यक्रम रद्द, पूरपरिस्थितीमुळे घेतला निर्णय…

पुणे : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. काही ठिकाणी या पूरपरिस्थितीमुळं नागरिकांची दुःखद जीवित हानी झाली आहे. त्याचबरोबर अनेक घरे, गृह उपयोगी वस्तू, आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे.

या परिस्थितीत पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथे २४-२५ सप्टेंबरला होणारा माझा ‘जनसंवाद’ कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मी स्वतः लवकरच पूरग्रस्त भागांना भेट देणार असल्याचे देखील ते म्हणाले.
तसेच राष्ट्रवादीच्या सर्व पालकमंत्र्यांनी आपल्या नेमून दिलेल्या जिल्ह्यात आणि आमदारांनी आपल्या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या बांधावर, गावोगावी नुकसानग्रस्त भागात जाऊन बाधित नागरिकांना त्वरित दिलासा व मदत द्यावी, तसेच प्रशासनाने त्वरित पंचनामे करण्यास सुरुवात करावी, असे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत सध्या शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला असून सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.