पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार! रस्ता न दिल्याच्या वादातून कुख्यात घायवळ टोळीचा गोळीबार, एक गंभीर जखमी…

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराचा प्रकार घडला आहे. मध्यरात्री कोथरूड परिसरात झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, कुख्यात गुंड निलेश घायवळ यांच्या टोळीकडून हा गोळीबार केला असल्याची माहिती आहे. गाडीला पुढे जाण्यास साईड न दिल्याच्या वादातून ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.
घायवळ टोळीतील गुंडांनी किरकोळ कारणावरून, फक्त गाडीला साईड न दिल्यामुळे, ३६ वर्षीय प्रकाश धुमाळ यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

प्रकाश धुमाळ हे त्यांच्या मित्रांसोबत उभे असताना, दुचाकीला साईड न दिल्याच्या कारणावरून घायवळ टोळीतील मयूर कुंभारे याने त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. या गोळ्या धुमाळ यांच्या मानेला व मांडीला लागल्या. रक्तस्त्राव इतका झाला की घटनास्थळी रक्ताचे ठसे स्पष्टपणे दिसून आले. जखमी अवस्थेत जीव वाचवण्यासाठी धुमाळ यांनी जवळच्याच एका इमारतीच्या पाण्याच्या टाकीवर चढून लपण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिक सचिन गोपाळघरे यांनी त्यांना तात्काळ पाणी देऊन मदत केली.
ही धक्कादायक घटना कोथरुड पोलिस ठाण्यापासून केवळ २०० मीटर अंतरावर घडली. मात्र तरीही पोलीस घटनास्थळी पोहोचायला तब्बल अर्धा तास उशीर झाला. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इतक्या जवळ असलेल्या ठिकाणी पोलिस वेळेवर पोहोचू शकले नाहीत, हा मुद्दा अत्यंत गंभीर मानला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात प्रमुख आरोपी मयूर कुंभारे आणि आनंद चांडलेकर यांना अटक करण्यात आली आहे. मात्र मुसा शेख, रोहित आखाड आणि गणेश राऊत हे इतर आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.