मोठी बातमी! मनोज जरांगेना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी अटीशर्थीसह परवानगी

मुंबई : मुंबईत आज गणेश उत्सवाची धामधूम चालू असताना मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे सरकार कात्रीत सापडले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. ते मुंबईत येऊन आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.मात्र मुंबई उच्च न्यायालयानेही त्यांना मुंबईत येण्यास मनाई केली होती. दरम्यान, आता त्यांना आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी मिळाली आहे. पण ही परवानगी देताना एकूण आठ आटी घालण्यात आल्या आहेत. यापैकी एका अटीने तर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या अटी कोणत्या?
अट क्रमांक – 1

जरांगे यांच्या आंदोलनासाठी एकूण आठ अटी घालण्यात आल्या आहेत. यातील पहिली अट म्हणजे त्यांच्या आंदोलनास एका वेळी फक्त एका दिवसासाठी परवनागी देण्यात आली आहेत. शनीवार, रविवार तसेच शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी कोणत्याही परवानग्या देण्यात येणार नाहीत.
अट क्रमांक -2
या आंदोलनादरम्यान, ठराविक वाहनांना परवानगी देण्यात आलेली असून वाहनतळासाठी वाहतूक पोलीसांशी विचारविनिमय करुन परवानगी देण्यात येईल. तसेच आपली वाहने मुंबईत प्रवेश केल्यानंतर ईस्टर्न फ्री वे या रस्त्याने वाडीबंदर जंक्शनपर्यंत येतील. त्यापुढे मुख्य आंदोलकासोबत फक्त 5 वाहने आझाद मैदान येथे जातील व इतर सर्व वाहने ही वाडीबंदर येथून पोलीसांनी निर्देशित केलेल्या शिवडी, ए शेड व कॉटनग्रीन परिसरात थेट नियोजित ठिकाणी पार्कंगकरिता नेण्यात यावीत.
अट क्रमांक -3
आंदोलकांची कमाल संख्या पाच हजार ही पाळणे बंधनकारक आहे. तसेच आझाद मैदानाचे 7000 स्कवेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलेले असून त्याची क्षमता 5000 पर्यंत आंदोलकांना सामावून घेण्याएवढीच आहे. परंतु तेथे प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानात पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही. तसेच आपले अर्जापूर्वी इतर आंदोलकांनी सुद्धा दिनांक २९/८/२०२५ रोजी आंदोलनासाठी परवानगी मागितलेली आहे. त्यांचा आंदोलनाचा हक्कसुद्धा बाधित करता येणार नाही. त्यामुळे ५००० आंदोलकांमध्ये त्यांचासुद्धा समावेश असेल. त्या आंदोलकांना मैदानातील पुरेशी जागा उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे.
अट क्रमांक -4
प्रतिबंधित केलेल्या क्षेत्राच्या दिशेने आणि क्षेत्राकडून मोर्चा नेला जाणार नाही.
अट क्रमांक -5
परवानगी घेतल्याशिवाय ध्वनीक्षेपक, सार्वजनिक प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणारी उपकरणे यांचा वापर करता येणार नाही.
अट क्रमांक -6
आंदोलनाची वेळ ही सकाळी ९.००. ते सायंकाळी ६.०० याच वेळेसाठी दिलेली असून त्यानंतर आंदोलकांना मैदानात थांबता येणार नाही.
अट क्रमांक -7
आंदोलक कोणतेही अन्न शिजवणार नाहीत किंवा केर कचरा टाकणार नाहीत असे महत्त्वाचे नियम असून इतरसुद्धा काही नियम घालून देण्यात आलेले आहेत.
अट क्रमांक -8
आंदोलनाच्या कालावधीदरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. त्यानुसार गणेश विर्सजनादरम्यान रहदारीस कोणताही अडथळा किंवा नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा धार्मिक भावना दुखावणार नाहीत याप्रकारचे आपणाकडून किंवा आपल्या आंदोलकाकडून असे कृत्य होणार नाही. तसेच आपले आंदोलन कार्यक्रमात लहान मुले, गरोदर स्त्रिया व वृद्घ व्यक्तींना सहभागी केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा एकूण आठ अटी मनोज जरांगे यांना घालण्यात आल्या आहेत.