रेल्वे प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी! सणांच्या काळात तिकीटावर डिस्काऊंट, रेल्वे मंत्र्यांनी केली मोठी घोषणा…


नवी दिल्ली : देशात सण, उत्सवांचा काळ येताच रेल्वे स्टेशन्सवर मोठी गर्दी पहायला मिळते. अनेकदा तिकीट न मिळाल्यामुळे लोकांना हजारो किमीचा प्रवास उभा राहून करावा लागतो. आता रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी घोषणा केली आहे.

जर, तुम्ही येण्या-जाण्याचं तिकीट एकाचवेळी काढलं तर तुम्हाला २० टक्के डिस्काऊंट मिळेल. रेल्वे मंत्रालयाने राऊंड ट्रिप पॅकेजची सुरुवात केली आहे. या योजनेनुसार, जर तुम्ही येण्या-जाण्याचं तिकीट एकाच वेळी काढले, तर तुम्हाला परतीच्या तिकिटावर २० टक्के सूट मिळणार आहे.

तसेच या योजनेचा उद्देश प्रवाशांना स्वस्तात प्रवास उपलब्ध करून देऊन गर्दीची वेगवेगळ्या दिवसांत विभागणी करणे आहे, ज्यामुळे प्रवास अधिक आरामदायक होईल.

रेल्वेच्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत कोणताही प्रवासी येण्या-जाण्याचं तिकीट एकाच वेळी बुक करत असेल, तर परतीच्या प्रवासासाठीच्या मूळ किमतीवर (बेस प्राइस) २० टक्के सवलत दिली जाईल. ही सवलत त्याच प्रवाशांना मिळेल, जे येण्या-जाण्याचं तिकीट एकाच नावाने आणि तपशिलांसह बुक करतील.

दोन्ही तिकीटे एकाच क्लासची आणि एकाच स्टेशनपासून तसेच एकाच स्टेशनपर्यंतची असली पाहिजेत. या योजनेनुसार येण्याचं तिकीट १३ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर २०२५ दरम्यानचे आणि परतीचं तिकीट १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५ दरम्यानचे असले पाहिजे.

या नव्या योजनेचा लाभ घेण्यासाठी येण्याचं तिकीट आधी बुक करावे लागेल आणि त्यानंतर ‘कनेक्टिंग जर्नी फीचर’द्वारे परतीचं तिकीट बुक करावे लागेल. परतीचं तिकीट बुक करताना ‘अ‍ॅडव्हान्स रिझर्वेशन पीरियड’ नियम लागू होणार नाही, परंतु अट एवढीच आहे की, दोन्ही बाजूंची तिकीटं कन्फर्म असावीत.

दरम्यान, एकदा तिकीट बुक झाल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही आणि ‘रिफंड’ची सुविधाही मिळणार नाही. तसेच, परतीचं तिकीट बुक करताना अन्य कोणतीही सवलत, व्हाउचर, पास किंवा रेल्वे ट्रॅव्हल कूपन लागू होणार नाही.

ही योजना सर्व क्लास आणि सर्व ट्रेन्सना लागू आहे, ज्यात स्पेशल ट्रेन्सचाही समावेश आहे. मात्र, ‘फ्लेक्सी फेअर’ असलेल्या ट्रेन्समध्ये ही सुविधा उपलब्ध नसेल. दोन्ही तिकीटं एकाच माध्यमातून बुक करावी लागतील – एकतर ऑनलाइन किंवा आरक्षण काउंटरवर जाऊन. या ऑफरमुळे सणांच्या काळात प्रवाशांची गर्दी वेगवेगळ्या तारखांमध्ये वाटली जाईल आणि खास ट्रेन्सचा दोन्ही बाजूंनी योग्य उपयोग होईल, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.

प्रवाशांना सहज तिकीट मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. रेल्वे प्रशासनाला प्रेस, मीडिया आणि स्टेशन्सवरून घोषणेद्वारे या योजनेचा विस्तृत प्रचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त प्रवाशांना याचा लाभ घेता येईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!