पालखीतील वारकरी बांधवांसाठी ‘फिरता वारकरी दवाखाना’ या उपक्रमाचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ..

पुणे : सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र आणि शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज पालखीतील वारकरी बांधवांसाठी ‘फिरता वारकरी दवाखाना’ या उपक्रमाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम वारकऱ्यांच्या सेवेसाठी निःस्वार्थ भावनेतून चालवला जात आहे, हे खरोखरच स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे. याचा वारकऱ्यांना नेहेमीच फायदा होत आला आहे. सध्या पालखी सोहळा सुरु झाला असून यामध्ये अनेक वारकरी सहभागी झाले आहेत.
यावेळी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती एस. बी. मुजुमदार (सर), प्रधान संचालिका विद्या येरवडेकर, कुलगुरू राधाकृष्ण रमण, डॉ. राजीव यरवडेकर, पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे, माजी नगरसेवक ॲड. अविनाश साळवे, डॉ. राजेंद्र गवई, उल्हास पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा ओढ लागलीय ती भगवान विठ्ठलाच्या भेटीची. ६ जुलैला आषाढी एकादशी असून महाराष्ट्रातील संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवू लागल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान १९ जून ला असून ५ जुलै पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. त्यानंतर ५ ते ९ जुलै पंढरपुरात मुक्काम केल्यानंतर माऊलींची पालखी पुन्हा दहा तारखेला पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परतीचा प्रवास करणार आहे.
आषाढी वारीत यंदाही लाखो वारकरी सहभागी होणार असून, पुणे शहरातून संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या २० जून ते २३ जून २०२५ या कालावधीत मार्गक्रमण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुणे पोलिस प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभी केली आहे.