महाराष्ट्रात ‘या’ ११ जिल्ह्यांना जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा धोका, हवामान विभागाने दिला मोठा इशारा..

मुंबई : महाराष्ट्रात यंदा मान्सूनने अपेक्षेपेक्षा १२ दिवस आधीच दाखल झाला आहे. कोकणात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. परंतु आता काही भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, आजपासून राज्यात हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थान परिसरात निर्माण झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे आणि उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील चार दिवस पावसात चढ-उतार पाहायला मिळणार आहेत.
काही ठिकाणी तापमान वाढण्याची शक्यता असून त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास होऊ शकतो. हवामान खात्याने अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या ११ जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दरम्यान, या भागांमध्ये पुढील तीन ते चार दिवस विजांचा कडकडाट, वादळी वारे (५० किमी प्रतितास) आणि मुसळधार पावसाचा जोर कायम राहील. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातही जोरदार पावसामुळे वडवणी तालुक्यातील १५ गावांचा संपर्क तुटला आहे. अमरावती आणि धाराशिव जिल्ह्यांत अर्ध्या तासात इतका पाऊस झाला की रस्ते पाण्याखाली गेले.