महाराष्ट्र केसरी स्पर्धेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले, थार, बुलेरो, 18 बुलेट, 30 सोन्याच्या अंगठ्या…

अहिल्यानगर : काल आहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. अंतिम लढत महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये झाली. महेंद्र गायकवाडने माती विभागातून अंतिम लढतीत प्रवेश केला होता. तसेच पृथ्वीराज हा मॅट विभागातून अंतिम लढतीत आला होता. महेंद्र आणि पृथ्वीराज यांच्यात तुल्यबळ लढत झाली.

यामध्ये कुस्ती चितपट न होता 2-1 प्लॅईंटच्या फरकाने ही कुस्ती पृथ्वीराज मोहोळ यांनी जिंकत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. महाराष्ट्र केसरी किताब लढतीच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेल्या बक्षिसांवरुन आयोजकांना सल्ला दिला.
यामुळे याची जोरदार चर्चा झाली. अजित पवार म्हणाले, अरुण काका जगताप आणि संग्राम जगताप यांनी अतिशय उत्तम पद्धतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. राज्यातल्या क्रीडा रसिकांनी त्याला चांगला प्रकारे साथ दिली आहे. तसेच या स्पर्धेत मोठी बक्षीस दिली जाणार आहेत.

यामध्ये विजेत्यांना थार मोटार, बुलेरो कार तसेच १८ बुलेट २० स्प्लेंडर, ३० सोन्याच्या अंगठ्या अशी बक्षीसं मला कुठे पाहायला मिळाली नव्हती. पुढच्या वेळेस जे स्पर्धा घेणार आहेत त्यांनी या बक्षिसांचाही विचार करावा आणि मग नंतर स्पर्धा घ्यावी. शेवटी हा पायंडा पडतो, असेही ते म्हणाले.
दरम्यान, स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात गादी विभागात डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ झाली. या लढतीमध्ये शिवराज राक्षे याला चितपट ठरवताना वाद झाला. आपण चितपट नसताना चितपट दिल्याचा आरोप राक्षे याने करत पंचांची कोलर पकडत लाथ मारली. यामुळे मोठी खळबळ उडाली.