Pune : खडकवासला ते फुरसुंगी भूमिगत बोगद्याला अखेर मान्यता, तांत्रिक सल्लागार समितीने घेतला निर्णय…

Pune : जलप्रदूषण रोखण्याबरोबरच पाणीसाठ्यात बचत करणाऱ्या खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान प्रस्तावित असलेल्या २८ किलोमीटर लांबीचा भूमिगत बोगद्याच्या (बंद कालवा) अहवालास राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीनकडून (स्टेट लेव्हल टेक्निकल ॲडव्हायजरी कमिटी) मान्यता मिळाली आहे.
त्यामुळे या प्रकल्पाच्या कामासाठी जलसंपदा विभागाकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून येत्या ३० सप्टेंबरपर्यंत निविदेसाठी मान्यता देण्यात आली आहे. खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान २८ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून पाणी नेण्याची योजना जलसंपदा विभागाकडून तयार करण्यात आली.
जलसंपदा विभागानेच तयार केलेला प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला होता. समितीने सुचविलेल्या दुरुस्त्या आणि त्रुटी दूर केल्यानंतर अखेर ५ सप्टेंबर रोजी प्रकल्पाला मान्यता प्राप्त झाली आहे. त्यातच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने तातडीने कामासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे.
प्रकल्पासाठी दोन हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित असताना सुमारे १६०० कोटी रुपयांच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत, असे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले. या प्रकल्पामुळे सुमारे अडीच टीएमसी (अब्ज घनफूट) पाण्याची बचत होणार आहे. तर अतिरिक्त ३ हजार ४७२ हेक्टरवरील क्षेत्राला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. Pune
या प्रकल्पासाठी एशियन डेव्हलपमेंट्स बँकेने कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाकडून २२०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून बँकेला सादर केला. प्रस्तावास मान्यता मिळाल्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्याने प्रत्यक्षात प्रकल्पाचे काम होण्यास किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.