हवेलीत ‘यशवंत’ उभा करण्यासाठी पुन्हा ‘आण्णासाहेब मगर ‘ घडतील काय ? शासन प्रयत्नांना कमी पडतो नेतृत्वाचा अभाव…!

जयदीप जाधव
उरुळी कांचन : थेऊर (ता.हवेली ) येथील गेली ११ वर्षांपासून बंद आवस्थेत असलेल्या ‘यशवंत ‘सहकारी साखर कारखान्या संदर्भात भविष्यातील वाटचालीसह संस्थेच्या कामकाजाविषयी निर्णय घेण्यासाठी सहकार खात्याकडून गतिमान हालचाली सुरू झाल्या आहेत. साखर आयुक्त व शासन नियुक्ती प्रशासक मंडळ कारखान्याचे ध्येयधोरण ठरविण्यासाठी लवकरच या संस्थेची सर्वसाधारण सभा घेणार आहेत. या सर्व हालचालींनी सभासदांचा गमावलेला आशावाद पुन्हा पल्लवीत झाला आहे. ही संस्था पुन्हा उभी रहावी असाच आशावाद शेतकऱ्यांचा आहे. मात्र राज्य शासन व सहकार विभागातील सकारात्मक प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी हवेलीतील सक्षम नेतृत्व पुढे येईलका किंवा ‘यशवंत’ कारखान्याबाबत पुन्हा एकदा आण्णासाहेब मगर यांच्या सारखे नेतृत्व तालुक्यात घडेल का ? या संपूर्ण प्रयत्नांवरच तालुक्यातील कारखान्याचे भविष्य अवलंबून असणार आहे.
राज्यातील सहकार चळवळीला ऐकेकाळी आदर्श दिलेल्या हवेली तालुक्याला सहकारी संस्थांच्या अस्तित्वासाठी झगडावे लागते आहे. तालुक्यातील सहकारीतील भूतकाळात घडलेल्या चूका व वरिष्ठांच्या राजकीय इच्छाशक्ती अभावी ही कामधेनू गेली ११ वर्षे बंद पडून अस्तित्वाच्या घटका मोजत आहे. खरे तर हवेली तालुक्यावर ही वेळ यायला नको होती , पण ‘मोठे घर पोकळ वासे’ ही आवस्था तालुक्याला रसातळाला नेऊन ठेवल्यासारखी झाली आहे. गेली ११ वर्षे संस्था बंद असल्याने शेतकरी, कामगार, वाहतुकदार व व्यावसायिक यांचे मोठे नुकसान तालुक्याने पाहिले आहे. गेली ११ सर्व राजकीय सत्ताधाऱ्यांनी भूलथापा देऊन तालुक्याचे शोषन केले आहे. मात्र आता तरी तालुक्यातील नेत्यांचा आत्मसन्मान जागा होणार का ? असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.
हवेली तालुक्यात यशवंत कारखान्यासाठी मागील काही काळापासून राज्य सरकार व सहकार विभागातील सकारात्मक हालचालींनी तालुक्याचे लक्ष्य वेधले आहे. कारखान्याबाबत कधी नव्हे ते सकारात्मक निर्णय होऊ लागले आहे. अलिकडे कारखान्याचे इतके वर्षे थकलेले लेखापरिक्षण असो की निर्णय प्रक्रियेतील भाग जलदगतीने होऊ लागल्याने सभासदांना खरेच कारखाना चालू होईल का म्हणून मनात कालवाकालवी सुरू झाली आहे. परंतु या सर्व प्रक्रियेत शासन व सहकार खात्याचा दिमतीला कारखाना उभा करण्यासाठी आवश्यक नेतृत्वाचा अभाव प्राकर्षाने जाणवत असल्याची उणीव निर्माण होत आहे. प्रत्येक संस्थेच्या जडणघडणीत एका नेतृत्वाची गरज असते मात्र पक्षीय राजकारण, कुरघोड्या आणि इच्छाशक्ती अभावाने संस्थेच्या शासनाच्या प्रयत्नाला यश मिळेल का म्हणून शंका उपस्थित होऊ लागली आहे.
दिवंगत तालुक्याचे भाग्यविधाते खासदार आण्णासाहेब मगर यांनी संस्थेचे १९६९ मध्ये उभारणी केली, त्यानंतर सक्षम नेतृत्वाने कारखान्याची धुरा संभाळली,असे नेतृत्व संस्था पुन्हा चालू करण्यासाठी मिळेल का , अशी अपेक्षा या प्रयत्नांना यशात रुपांतरीत करण्यासाठी लागणार आहे. कारण प्रत्येक सहकारी संस्था सक्षम नेतृत्वात सक्षम वाटचाल करु शकतात, तसे नेतृत्व यशवंतच्या रुतलेल्या चाकांना पुढे ढकलण्यात बळ देईल का म्हणून वाट बघू लागले आहे. तालुक्यात सक्षम नेतृत्वाने सकारात्मक पाठपुरावा केल्यास निश्चित या संस्थेला नव्याने उभारी मिळेल, परंतु पक्षीय राजकारण दूर ठेवल्यास यशवंतला गतवैभव मिळणे फार अवघड बाब नाही असा एक चर्चेचा सूर निघत आहे.
बाजार समिती झाली आता कारखाना व्हावा !
कारखान्याप्रमाणे हवेली बाजार समितीने १९ वर्षे प्रशासकीय राजवट पाहिली आहे. अनेक लचके तोडल्यानंतर कधी जिल्हा, कधी राज्य असे नामांतरण करुन बाजार समितीचे अस्तित्व १९ तालुक्याला लाभले नाही. शिंदे व फडणवीस सरकारने बाजार समितीला पुन्हा एकदा तालुक्याचा दर्जा बहाल केला आहे. या संस्थेवर तालुक्याचे प्रतिनिधित्व येणार आहे, या प्रयत्नांप्रमाणे कारखाना विषय हाताळल्यास बाजार समितीच्या ठेवींतूनच कारखान्याचे अर्थिक गणित संस्था उभारण्यासाठी मिळू शकते.