६ ऑफिस, २५ कोटी अन् ‘ती’ बाई, वाल्मिक अण्णा गँगचा पुण्यातला अजून एक कुटाना आला समोर….

बीड : जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणावरुन राजकीय क्षेत्रात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्यातच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे.
अशातच आता परळी आणि बीडममध्ये गुन्हेगारी मार्गाने कमावलेल्या पैशातून वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने राज्यातील वेगवगेळ्या शहरांत कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप होत आहे.
त्यातूनच पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत वाल्मिक कराड आणि टोळीने २५ कोटी रुपये खर्चून सहा ऑफिस स्पेस विकत घेतल्याचा दावा करण्यात येतोय. त्यातूनच आता या प्रकरणात ईडीची एंट्री होऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बरोबर समोर काम सुरू असलेल्या असलेल्या या इमारतीत वाल्मिक कराड, त्याच्याशी संबंधित एक महिला आणि विष्णू चाटेच्या नावे सहा ऑफिस स्पेसेस बुक करण्यात आल्या आहे.
पंचवीस कोटी रुपये मोजून वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने या इमारतीत या ऑफिस स्पेसेस खरेदी करण्यासाठी बिल्डरसोबत करार केला. इमारतीचं काम पूर्ण झालं की, त्यांच्यामध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण होणार होता.
मात्र त्याआधीच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे वाल्मिक कराड आणि टोळीभोवती आरोपांच वादळ उठलं आणि त्यातून या टोळीच्या आर्थिक व्यवहारांची खणून काढली जातेय.
दरम्यान, वाल्मिक कराड आणि टोळीच्या वर्चस्वाला जसा दहशतीचा आधार आहे, तसाच या दहशतीतून निर्माण झालेल्या पैशातून या टोळीने राज्यभरात जे उद्योग आणि धंदे सुरू केलेत त्यातून मिळणाऱ्या पैशांचं पाठबळ आहे म्हणून दहशतीचं हे वर्चस्व मोडून काढायचं असेल तर या अशा आर्थिक स्रोतांवर देखील कारवाई व्हायला हवी. त्यातूनच ईडी अर्थात एन्फोर्समेंट डिरेक्टरेटच्या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंकडे घरकाम करणारा पोऱ्या म्हणून वाल्मिक कराडने सुरुवात केली. पुढच्या काळात धनंजय मुंडेंचा अतिशय विश्वासू म्हणून तो ओळखला जाऊ लागला. सत्तेच्या या जवळकीचा उपयोग करत वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने कोट्यवधी रुपयांची माया जमवली. याच पैशांच्या आधारे पुण्या-मुंबईसह अनेक शहरांमध्ये वाल्मिक कराड आणि टोळीने उद्योग आणि व्यवसायांमध्ये पैसे गुंतवल्याचा आरोप होत आहे.