भूममध्ये 35 गाई दगावल्या, रोहित पवारांनी रात्री भेट देऊन घेतला आढावा, आता शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा…

धाराशिव : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून अनेक ठिकाणी पूर आला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यामुळे झाले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना मदतीची मागणी केली जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मागणी केली आहे.

रोहित म्हणाले, अतिवृष्टीमुळं बाणगंगा नदीला आलेल्या पुरात भूम तालुक्यात चिंचपूर (ढगे) जि. धाराशीव, येथील विश्वनाथ दातखिळे यांच्या तब्बल ३५ गाई दगावल्या. त्यापैकी काही गाई तर वाहून गेल्याने त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. याठिकाणी भेट देऊन त्यांनी आढावा घेतला.
तसेच काल मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी याठिकाणी भेट देण्याचं टाळलं तरी रात्री उशीरा विश्वनाथ दातखिळे यांच्या घरी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि त्यांना धीर दिला. सर्वस्व वाहून जाणं म्हणजे काय याचं अत्यंत विदारक आणि विषण्ण चित्र याठिकाणी बघायला मिळालं असेही रोहित पवार म्हणाले.

सरकारला पंचनामे करताना नियमांवर बोट न ठेवता संवेदनशीलपणा दाखवून काम करण्याची आणि झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी लागेल. या भागात चिंचपूरसह नदीकाठच्या बेलगाव, पिंपळगाव, कानडी, आंतरगाव आणि इडा या गावांमध्येही शेती, फळबागा, पशुधन आणि घरांचं अतोनात नुकसान झालंय.
याबाबत धनंजय जाधव, लखन जाधव, कोहिनूर सय्यद, बाजीराव दातखिळे, दत्तात्रेय तांबे आणि अमोल ढगे आदी शेतकऱ्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली आणि झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.