मोठी बातमी! राज्यात पावसामुळे १२ जणांचा मृत्यू, मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये तुफान हाहाकार…

पुणे : मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या २-३ दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबईतील अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचल्याने परिस्थिती खराब आहे.

गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने राज्यभरात १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे . यात नांदेड जिल्ह्यात पूरग्रस्त परिस्थितीमुळे ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. कोकण, मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टी झाली असून पिकं पाण्याखाली गेली आहेत .
आठवड्याच्या सुरुवातीलाच झालेल्या बेफाम पावसाने नोकरदारांची दैना झाल्याचं दिसून आलं. मराठवाड्यात पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या पावसाने अनेक गाव जलमय झाली असून ढगफुटीसदृश्य पावसामुळे शेकडो जनावरांचा मृत्यू झालाय .अनेकांची घर पाण्याखाली गेली आहेत. नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे .

नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर बनली होती. ढगफुटी सदृश्य परिस्थितीत तब्बल ९ जणांचा मृत्यू झाला. मात्र सध्या नांदेडमधील पाऊस ओसरला असून परिस्थिती सामान्य होत आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, जेवणखाण्याची व्यवस्था केली आहे. गरज पडल्यास लष्कराची मदत घेतली असल्याचंही मंत्री महाजन यांनी सांगितले आहे.

दरम्यान, त्याच वेळी, नांदेड जिल्ह्यात २०० हून अधिक लोक अडकले होते, ज्यांच्या बचावासाठी सैन्याला पाचारण करावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीमुळे ९ जणांचा मृत्यू झाला तर मुंबईत एका व्यक्तीचा भिंत पडून मृत्यू झाला. आणि दोन राज्यातील इतर भागातून मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.