मोठी बातमी! संध्याकाळपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होणार, चंद्रकांतदादांची माहिती…

मुंबई : आज भाजपचा विजयी संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, कदाचित आज (4 ऑक्टोबर) संध्याकाळपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होईल. आता कुणीतरी म्हणतील निवडणूक आयोगाशी दादांची चर्चा झाली वाटतं.

मी 40 वर्षे यामध्ये घालवली त्यामुळे मी अंदाज मांडला आहे. दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता जाहीर होईल, त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, लोकसभा, विधानसभेपेक्षा नेत्याची खरी निवडणूक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका असते. लोकशाहीमधील सर्वात महत्त्वाची ही निवडणूक आहे.
तसेच ते म्हणाले, 2017 ची परिस्थिती बदला, त्यासाठी येणाऱ्या दिवाळीचा फायदा करून घ्या. लोकांना भेटून संपर्क वाढवा. निवडणूक महायुती म्हणून लढवायची आहे मात्र शेवटच्या क्षणी कोणता निर्णय घ्यायचा हे वरिष्ठ नेते ठरवतील.

असे ते म्हणाले. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मागत असलेल्या ठिकाणी आपला चांगला उमेदवार असेल तर मैत्रीत लढू, पण कार्यकर्त्यांचा बळी दिला जाईल असं लढणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 2019 साली उद्धव ठाकरे यांनी हे सगळं करून काय मिळवलं? उतू नको मातू नको, घेतला वसा सोडू नको.
निवडणुका होऊन जातील पण पार्टीसाठी काम करत राहील पाहिजे. मी कधीच कोणतं तिकीट मागितलं नाही, निवडणूक ही फास्ट ट्रेन प्रमाणे आहे, प्लॅटफार्मवर जो राहील तो राहील. मात्र, नाराज होऊ नका. राजकारणात प्रयत्नाबरोबर नशीब देखील लागतं. असेही त्यांनी सांगितले आहे.