Uruli Kanchan : दुर्दैवी! एंगेजमेंट अँनिवर्सरीला दुपारची सुट्टी घेऊन घरी निघाला, काळाने घात केला, सोरतापवाडीत अपघातात तरुण जागीच ठार..!!

Uruli Kanchan : एंगेजमेंट अॅनिवर्सरी साजरी करण्यासाठी कंपनीतून दुपारून सुट्टी घेऊन दुचाकीवरून घरी निघालेल्या तरुणाचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.
पुणे – सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वाकडा पूल परिसरात दुचाकीने पाठीमागून ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात बुधवारी (ता. १०) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला आहे.
ऋषिकेश विजय गायकवाड (वय.२७, रा. गोसावी वस्ती, आश्रम रोड, उरुळी कांचन, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश हा मांजरी येथील नामांकित सिरम या कंपनीत कामाला होता. तर, त्याचे वडील हे टेल्को या कंपनीत कामाला आहेत. ऋषिकेश याचा मागील तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता.
कामावर तो रोज बसने ये-जा करीत होता. आज बुधवारी एंगेजमेंट अॅनिवर्सरीचे साजरी करण्यासाठी ऋषिकेश याने दुपारून सुट्टी घेतली होती. तसेच आज तो दुचाकी घेऊन कंपनीत आला होता. Uruli Kanchan
दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतिल वाकडा पूल या ठिकाणी उरुळी कांचनच्या बाजूने जात असताना समोर असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली.
हा अपघात एवढा भीषण होता की, ऋषिकेश याच्या डोक्याला व अंगावर मोठ्या जखमा झाल्या होत्या. दरम्यान, त्याला लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
तीन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न..
अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच ऋषिकेश याचे लग्न झाले होते. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, बहिण, पत्नी, असा परिवार आहे. फुरसुंगी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव आबा सायकर यांचे बंधू मुरलीधर सायकर यांचे ते जावई होत.