उशिरा आला पण जोरदार आला! देशभरात तुफान पाऊस, कुठे अतिवृष्टी तर कुठे…
पुणे : यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने अनेकांची चिंता वाढली होती. असे असताना आता सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे. मॉन्सूनची थांबलेली वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे.
पावसामुळे एककीकडे नागरिकांमध्ये पावसामुळे आनंदाचे वातावरण असले तरी काही ठिकाणी पावसामुळे मोठ्या हानी झाल्या आहेत. शहरी भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.
दरम्यान उत्तराखंडमध्ये काही भागात भूस्खलनाच्या घटना देखील समोर आल्या आहेत. तर शिमल्यामध्ये ढगफुटी झाली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट तर हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
पुढील 48 तासांत देशातील विविध भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, राज्यात विदर्भात जोरदार कोसळणाऱ्या वरुणराजाने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हजेरी लावली आहे.
संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्रात पावसाला सुरुवात झाल्याने आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता खरिपाच्या पेरण्यांसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
यासाठी शेतकऱ्यांची तयारी झाली असून आता लवकरच पेरण्यांची कामे सुरू होणार आहेत. जूनच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पूर्वमशागतीसह पेरण्यांची कामे खोळंबली होती. मात्र मॉन्सूनचे प्रवाह सुरळीत झाल्यानंतर दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत पावसाला सुरुवात झाली आहे.
सध्या अनेक जिल्ह्यात पाऊस पडत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावली. शनिवारी सकाळपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली.