शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना!! नवीन वर्षात रासायनिक खतांच्या किमती वाढणार, शेतीचे गणित कोलमडणार, जाणून घ्या नवीन दर…

पुणे : शेतकऱ्यांना शेतीच्या खतांचा दरवाढीचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून सतावत आहे. यातच आता नवीन वर्षात हे दर अजूनच वाढणार असल्याचे समोर आले आहे. पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाचे २२ हजार हेक्टर, तर उन्हाळी हंगामाचे सुमारे तीन हजार ५०० हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यात सर्वत्र ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे.
असे असताना आता नवीन वर्षात १ जानेवारीपासून रासायनिक खतांचे दर वाढणार असून, १०:२६:२६ खताची बॅग आता २५५ रुपये वाढीव दराने मिळणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसणार असून आर्थिक गणित कोलमडणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात खताची मागणी पाहता शेतकऱ्यांना २५ कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.
सध्या उसाच्या खोडवा पिकाची भरणी आणि लागवडीचे खते टाकण्याची कामे होणार असताना जिल्ह्यात डी.ए.पी. आणि १० : २६ : २६ व १२: ३२:१६, तसेच टी. एस. पी खताची दरवाढ केली आहे. यामुळे शेतकरी नाराज आहे. या खतांचा पुरवठा देखील जास्त नसल्याने जास्त दर दुकानदार लावतात.
दरम्यान, कंपनीकडून वाढीव दराचे परिपत्रक आले असून रब्बी उन्हाळी लागणी हंगामाच्या तोंडावर ही दरवाढ होणार आहे. यंदा उसाची एफ.आर.पी., तोडणी, वाहतूक खर्च वजा जाता फक्त ५० रुपयेच शेतकऱ्याला वाढीव मिळणार आहे. यामुळे शेती करायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच यंदा अतिवृष्टीमुळे उत्पादनही घटल्याने शेतकऱ्यांचा पाय आर्थिक खोलात जात आहे. यामध्ये १०:२६:२६ १४७० ते १७२५ वाढ २५५. तसेच १२:३२:१६ १४७० ते १७२५ वाढ २५५. आणि डी. ए. पी. १३५० ते १५९० वाढ २४०. तसेच टी. एस. पी. (४६ टक्के) १३०० ते १३५० वाढ ५० रुपये असे नवीन दर आहेत.
दरम्यान, फक्त पुणे जिल्ह्यात तीन खताच्या सुमारे नऊ लाख बॅगची मागणी असते. या तीन खतापोटी दर वाढल्यामुळे २५ कोटींचा भुर्दंड शेतकऱ्यांच्यावर पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.