यंदा गणेश विसर्जनही पावसात! पुढील 3 दिवस महत्वाचे, ‘या’ ११ जिल्ह्यांसाठी रेड व ऑरेंज अलर्ट जारी…

पुणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला असून कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर थोडा कमी झाला होता.

मात्र गणेशोत्सवाच्या निरोपाच्या पार्श्वभूमीवर कोकणात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने किमान चार दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा इशारा दिला आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याची तीव्रता वाढली आहे. त्याशिवाय दोन ठिकाणी कमी दाबाची प्रणाली सक्रीय झाली आहे. त्यामुळे वाऱ्यांची दिशा बदलली असून, त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रासह गुजरातच्या हवामानावर होत आहे. गुजरातसाठीही अती मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील एकूण ११ जिल्ह्यांसाठी रेड ते ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या भागात सलग चार दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून विकेंडमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, घाटमाथा, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. लातूर, धाराशिव, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत पावसाचा इशारा नाही, मात्र ढगाळ वातावरणामुळे उकाड्याचा त्रास जाणवणार आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता असून त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होईल, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
साताऱ्यातील कोयना धरण ९९ टक्के भरले असून, वाढलेल्या पावसामुळे धरणाचे सर्व दरवाजे तिसऱ्यांदा उघडण्यात आले आहेत. १५,७०० क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. अकोला आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.