क्रांतिवीर चाफेकर बंधूचे स्मारक युवकांना देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

पुणे : ‘हुतात्मांच्या कार्यातून देशभक्तीची प्रेरणा मिळत असते. चापेकर बंधु अशाच हुतात्मांपैकी एक होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांचे कार्य चापेकर स्मारकाच्या माध्यमातून नागरिकांसमोर येणार असून हे केंद्र खऱ्या अर्थाने युवकांना देशभक्तीचे संस्कार देणारे ठरेल. हे स्मारक उभारताना तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तमरित्या वापर करण्यात आला असून ते केवळ पिंपरी चिंचवडसाठी मर्य़ादित न राहता महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे ठरेल, असे प्रतिपाद महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण व राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘चापेकर वाडा येथे उभारण्यात येत असलेले स्मारक अतिशय सुंदर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या स्मारकात चापेकर बंधू यांच्या जीवनाशी संबंधित एकूण १४ प्रसंग आहेत.’ चापेकर बंधूनी केलेल्या रँडच्या वधाबद्दल सविस्तर माहितीही यावेळी त्यांनी दिली.
‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा चापेकर बंधूनी घेतली होती. चापेकर वाडा येथे उभारण्यात आलेले स्मारक हे लवकरच राष्ट्रीय स्मारक होणार आहे. भारताचा सूवर्णमय इतिहास या स्मारकात पाहण्यास मिळेल, या स्मारकात दृकश्राव्य माध्यमातून त्या काळातील प्रसंग आपल्याला समजून घेता येतो असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
चापेकर स्मारकाचे भुमिपूजन आणि आज स्मारकाचे लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली त्यामुळे मी स्वतःला फार भाग्यवान समजतो, क्रांतिवीर चाफेकर स्मारक समितीच्या वतीने चालविण्यात येत असलेले येथील समरसता गुरुकुलम संस्थेस भेट देण्याची संधी मला मिळाली या संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य उत्तम असून, आपण समाजातील वंचित समाजाला समरसतेतून संस्कारी कसे करू शकतो याचे आदर्श व उत्तम उदाहरण संस्थेत पहावयास मिळते. या संस्थेचे कार्य पुढे येण्यासाठी जागेची कमतरता भासणार नाही. जागा उपलब्ध करून दिली जाईल या चांगल्या उपक्रमासाठी,शासन या संस्थेस मदत करेल अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.