बच्चू कडूंना सर्वात मोठा धक्का, जिल्हा बँक अपात्रता प्रकरणात दिलासा नाहीच, नेमकं काय घडलं न्यायालयात?

अमरावती : अमरावती जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या अपात्रता प्रकरणी बच्चू कडूना दिलासा मिळालेला नाही. अध्यक्षपदाच्या अपात्रतेच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. मात्र विरोधकांना आणि सहकार विभागाला जबाब दाखल करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.
तसेच या प्रकरणी न्यायालय २४ जूनला अंतिम निर्णय देणार आहे. नाशिकच्या न्यायालयाने बच्चू कडूंना एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. शिक्षा सुनावल्यामुळे नियमानुसार बच्चू कडूंना सहकार विभागाने जिल्हा बँकेचे अध्यक्षपदासाठी अपात्र ठरवले होते. या निर्णयाला बच्चू कडूनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते.
या प्रकरणी आज उच्च न्यायालयात न्यायमूर्ती पानसरे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. बच्चू कडूंना दिलेली एका वर्षाची शिक्षा उच्च न्यायालयाने निलंबित केली होती. त्यामुळे बच्चू कडूंना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र करता येणार नाही, असा युक्तिवाद कडू यांच्या वकीलांनी कोर्टात केला.
दरम्यान, याच प्रकरणात तक्रारदार असलेल्या विरोधकांनी न्यायालयात कॅवेट दाखल केली होती. त्यानुसार न्यायमूर्ती पानसरे यांनी विरोधक व सहकार विभागाला आपले म्हणणे मांडायची संधी दिली आहे. विरोधकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर २४ जूनला बच्चू कडूंच्या अध्यक्षपदाच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय दिला जाणार आहे.
प्रहारचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना नाशिकच्या विशेष न्यायालयाने एक वर्षाचा सश्रम कारावास ठोठावला होता. या शिक्षेच्या नियमावर बोट ठेवतं अमरावतीच्या विभागीय निबंधकांनी (सहकारी संस्था) कडू यांच्यावर कारवाई केली होती.
त्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक तथा अध्यक्ष पदावरून अपात्र ठरवले होते. त्यानंतर राजकारणासह सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती. या निर्णयाविरुद्ध कडूंनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती.