शिंदे, अजितदादांचं टेन्शन वाढलं! ऐन दिवाळीच्या धामधुमीत देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, नेमकं काय म्हणाले?

पुणे : पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पहाता आणि सुरू असलेला मराठा -ओबीसी वाद पहाता या निवडणुकांकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

दरम्यान या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की? घटक पक्ष स्वबळाचा नारा देणार याबाबत अद्याप सर्वच अस्पष्ट आहे. आता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
एमएमआर रिजनमध्ये काही ठिकाणी आम्ही वेगळे लढणार तर काही ठिकाणी युतीत लढणार असं देवेंद्र फडणवीस यांनी आता स्पष्ट केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी आणखी एक मोठं वक्तव्य केलं आहे. २०२९ पर्यंत मी कुठेही जाणार नाही, असं फडणवीस म्हणाले आहेत, दरम्यान फडणवीस यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिथे -जिथे विरोधकांना फायदा आहे, तिथे -तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीमध्ये लढवल्या जाणार आहेत, असं फडणवीस यांनी बुधवारीच स्पष्ट केलं होतं. मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढवणार आहेत.
तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप निवडणूक स्वबळावर लढणार आहे, ठाण्याबाबत अजूनही कोणताही निर्णय झालेला नाही, मात्र समोर येत असलेल्या माहितीनुसार ठाण्यामध्ये युतीबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत.