मराठा आंदोलकांनी घातलेल्या घेरावानंतर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, मराठा तरुणांच्या मनात…

पुणे : सध्या मुंबईत मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर मराठा समाज मुंबईत दाखल होत आहे. यामुळे लवकरच तोडगा काढावा अशी मागणी केली जात आहे.

तसेच काल खासदार सुप्रिया सुळे या जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आझाद मैदानावर गेल्या होत्या. मात्र, भेटीनंतर बाहेर पडताना आंदोलकांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही आंदोलकांनी थेट त्यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या, तसेच गाडी अडवून नाराजी व्यक्त केली.
या संपूर्ण प्रसंगानंतर आज सुप्रिया सुळे यांनी पुण्यातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुळे म्हणाल्या, इतके मोठे आंदोलन सुरू आहे, त्यामुळे काही घटना घडणे साहजिक आहे. तरुण मुलांच्या मनात काही भावना असतात. माझी नैतिक जबाबदारी असल्याने मी काल जरांगे पाटील यांना भेटायला गेले. त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि थोडक्यात चर्चा केली.

तसेच, आंदोलनाच्या ठिकाणी स्वच्छतेची मोठी समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. “माझी राज्य सरकारला आणि मुंबई महापालिकेला विनंती आहे की आंदोलनाच्या ठिकाणच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. पाऊस प्रचंड आहे, काही ठिकाणी वीज नाही, त्यामुळे आंदोलकांची गैरसोय होत आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुप्रिया सुळे यांनी थेट सरकारवर टीका करताना सांगितले की, २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचा जो मार्ग सांगितला होता त्याची अंमलबजावणी करा. सलग अकरा वर्षे भाजपचे सरकार असूनही प्रश्न सुटलेला नाही. आज ज्यांच्याकडे आमदार-खासदार जास्त आहेत त्यांच्याकडूनच अपेक्षा आहे.
त्यांनी पुढे म्हटले की, आंदोलनासाठी जबाबदार सध्याचे सरकार आहे. निर्णय घ्यायचा असेल तर सर्वपक्षीय बैठक बोलवा, अधिवेशन बोलवा आणि २४ तासांत निर्णय घ्या. गृहखात्याला जर आंदोलकांना रसद पुरवणाऱ्यांची माहिती असेल तर ती सार्वजनिक करा. नाहीतर सरकार अपयशी ठरेल.