‘रात्री अचानक पोलीस धाड, सकाळी अटक…’ विकास लवांडेंच्या कारवाईने पुण्यात खळबळ; “चोर सोडून संन्याशाला फाशी”चा आरोप

पुणे : पुण्यातील हवेली परिसरात घडलेल्या शाईफेक प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या कारवाईवर लवांडेंनी थेट हल्लाबोल करत “चोर सोडून संन्याशाला फाशी” असा गंभीर आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी लवांडेंना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सांगितले जात असले तरी, लवांडेंचा दावा आहे की कोणतीही पूर्वसूचना न देता थेट त्यांच्या घरी रात्री पोलीस पोहोचले आणि कुटुंबीयांना घाबरवणारी कारवाई करण्यात आली.
दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी झालेल्या कथित हल्ल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. लवांडेंच्या म्हणण्यानुसार, त्यांना स्मशानभूमी परिसरात अडवून शाईफेक करण्यात आली, मारहाण झाली आणि “पिस्तूल दाखवून तुझा खात्मा करतो” अशा गंभीर धमक्या देण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात 10 ते 12 जण सहभागी असल्याचा त्यांचा आरोप असून, आरोपी अद्याप मोकाट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लवांडेंनी सोशल मीडियावरही आक्रमक भूमिका घेतली आहे. “माझ्यावर अन्यायकारक कारवाई होत आहे. मी कायदा पाळणारा नागरिक असून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी पोलिसांना आव्हान देत पुरावे सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती असून, घटनेचा व्हिडिओ आणि तक्रारीची पडताळणी सुरू आहे. काही आरोपींची ओळख पटली असून उर्वरितांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही नेत्यांनी पोलिस कारवाईचे समर्थन केले असून काहींनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. तर दुसरीकडे, शरद पवार यांनी लवांडेंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत पोलिसांकडे तातडीने संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, पुढील तपासात अधिक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.