गृहिणींच्या बजेटवर ताण, उन्हाच्या तडाख्यानं पालेभाज्या महागल्या, जाणून घ्या..

पुणे : पिंपरी आणि परिसरातील भाजीपाला बाजारात गेल्या काही दिवसांपासून दरवाढ झाली आहे. वाढत्या उन्हामुळे ग्रामीण भागातून होणारी भाजीपाल्याची आवक घटल्याने, विशेषतः पालेभाज्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला महागाईचा फटका बसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे टोमॅटोचे दर मात्र काही प्रमाणात खाली आले आहेत. उन्हाच्या तडाख्याचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या उत्पादनावर आणि पुरवठ्यावर झाला आहे.
तसेच आवक कमी झाल्याने पालेभाज्यांचे दर गेल्या महिन्याच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाले आहेत. उदाहरणार्थ, मेथीची जुडी जी पूर्वी १५ रुपयांना मिळत होती, ती आता किरकोळ बाजारात २५ रुपयांना विकली जात आहे. कोथिंबिरीची जुडीही १५ रुपयांवरून २० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. शेपू, पालक यांचे दरही वाढले आहेत.
दरम्यान, दुसरीकडे, मागील आठवड्यात १०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचलेले टोमॅटोचे दर आता लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत. आवक वाढल्याने घाऊक बाजारात दर २५-२७ रुपये किलोवर आले असून, किरकोळ विक्री ३०-४० रुपये किलोने होत आहे. कांद्याचे दर किरकोळ बाजारात ४०-४५ रुपये प्रति किलोवर स्थिर आहेत, तर लसणाचे दर १०० रुपये प्रति किलोवर कायम आहेत.