महाराष्ट्रात दिवसाला तब्बल 24 अत्याचार! रोहित पवारांची धक्कादायक आकडेवारी

पुणे : महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आणि याला कारण ठरली आहे रोहित पवार यांनी मांडलेली धक्कादायक आकडेवारी. राज्यात दिवसाला तब्बल 24 अत्याचार घडत असून तासाला एक महिला अत्याचाराची शिकार होते, असे सांगत त्यांनी परिस्थिती किती भीषण बनली आहे, याकडे लक्ष वेधले.

अलीकडच्या काळात बीड, बदलापूर आणि बारामती येथे घडलेल्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, या केवळ वेगळ्या घटना नाहीत, तर वाढत्या गुन्हेगारीचे संकेत आहेत आणि त्यामुळेच समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. दरवर्षी सुमारे 50 हजार महिलांवर अत्याचार होतात, ही बाब अधिकच धक्कादायक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला.

कठोर कारवाई, फास्टट्रॅक कोर्ट आणि ‘शक्ती कायदा’ तातडीने लागू करण्याची मागणी करत त्यांनी इशारा दिला की, “जर आत्ताच कठोर पावले उचलली नाहीत, तर ही आकडेवारी आणखी भयानक होऊ शकते.” राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर यामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
