संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान!! इंद्रायणीच्या तीरावर हजारो वारकरी दाखल…

पुणे : महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा ओढ लागलीय ती भगवान विठ्ठलाच्या भेटीची. ६ जुलैला आषाढी एकादशी असून महाराष्ट्रातील संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवू लागल्या आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान १९ जून ला असून ५ जुलै पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. त्यानंतर ५ ते ९ जुलै पंढरपुरात मुक्काम केल्यानंतर माऊलींची पालखी पुन्हा दहा तारखेला पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परतीचा प्रवास करणार आहे.
आषाढी वारीत यंदाही लाखो वारकरी सहभागी होणार असून, पुणे शहरातून संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या २० जून ते २३ जून २०२५ या कालावधीत मार्गक्रमण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुणे पोलिस प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभी केली आहे.

दरम्यान, वारीच्या काळात लाखोंच्या संख्येने वारकरी पुण्यात दाखल होतात. गर्दीचे योग्य व्यवस्थापन, वाहतुकीचा सुरळीत प्रवाह आणि संभाव्य आपत्कालीन घटनांवर तात्काळ नियंत्रण ठेवण्यासाठी 8 हजारांहून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
कसा असेल पोलीस बंदोबस्त?
अतिरिक्त आयुक्त- ४
पोलीस उपायुक्त – १०
सहाय्यक आयुक्त- २०
पोलीस निरीक्षक- १२८
सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक- ५१३
पोलीस अंमलदार- ६१४३
एसआरपीएफ- एक कंपनी
होमगार्ड- १२४०
क्यूआरटी- १२
बीडीडीएस- ६ पथके.
दरम्यान, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर ही काही प्रमाणात पाणी साचत आहे. मात्र ऊन, वारा अन पाऊस काहीही असो वारकऱ्यांना पांडुरंगाच्या भेटीची ओढ असते, त्यामुळं तो सर्व काही विसरुन पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतो.
तुकोबांच्या पालखी प्रस्थानानंतर आज पालखी देहूतून पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीत मुक्कामी येणार आहे. पण या मार्गावर आता परिस्थिती आवाक्यात असली तरी पावसाचा जोर वाढला तर रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे, असं असलं तरी वारकरी पावसात ही आजचा टप्पा पूर्ण करणार आहेत.