पत्रकारांनी आवाज उठविल्यानंतर प्रशासनास जाग ! उरुळी कांचन उपविभागातील वीज समस्या सोडवून दाखविणार …!

उरुळी कांचन : उरुळी कांचन उपविभागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पुरंदर उपसा सिंचन योजनेचा पुरवठा कार्यान्वित करणे,वीज उपकेंद्रासाठी निर्मिती करणे तसेच यवत उपकेंद्रातून येणाऱ्या ३३ के.व्ही पुरवठा करणाऱ्या वाहिनीवर एबी स्वीचेस बसवून तातडीने दोष शोधून काढण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती मुळशी विभागा चे कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांनी उरुळी कांचन येथे पत्रकारांशी दिली.
उरुळी कांचन उपविभागातील उरुळी कांचन शहरात मागील काही दिवसांत सातत्याने वीजपुरवठा खंडीत व नादुरुस्त होत आहे. या मूळच्या भेडसावणाऱ्या प्रश्नावर पत्रकारांनी आवाज उठविल्यानंतर मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांनी उरुळी कांचन उपविभागात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी गेली १० वर्षांत उरुळी कांचन उपविभागाला मुबलक पुरवठा होईल, अशा पद्धतीने २२के.व्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र झाले नसल्याची खंत बोलुन दाखविली आहे.
उरुळी कांचन उपविभागात कोरेगावमूळ व वळती फिडरवर होत असलेल्या वारंवार बिघाडाने या ठिकाणी वीज उपकेंद्राची निर्मितीचा प्रस्ताव गेली काही वर्षे पडून आहे. पर्यायी शासनाची जमीन मिळण्याबाबत तरडे येथील ग्रामस्थांनी विरोध केल्याने पर्यायी जागेअभावी शोध सुरू आहे. त्यामुळे उरुळी कांचन ला पर्याप्त होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र अशावेळी थेऊर उपकेंद्रातून कोरेगावमूळ फिडरवर स्वतंत्र फिडर कार्यान्वित करण्यासाठी पर्याय उपलब्ध असला तरी स्थानिक शेतकरी हे वाहिनी टाकण्यास विरोध करत असल्याने नाईलाजास्तव उरुळीकांचन ला यवत उपकेंद्रातून पुरवठा करावा लागत आहे.
दुसरीकडे यवत केंद्रातून कोरेगावमूळ फिडरसाठी १६ कि.मी. अंतरावर पुरवठा होत असल्याने वाहिनी नादुरुस्त झाल्यामुळे तासतास शहरात वीजपुरवठा बंद पडत असल्याची समस्या आहे. दुसरीकडे उरुळी कांचन शहराला पुरंदर उपसा योजना याद्वारे पुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला असला ,तरी तो अद्याप मंजुरी मिळत नसल्याने, आहे त्या यवत उपकेंद्रातून एबी स्वीच यंत्रणा कार्यान्वित करुन पुरवठा करण्याचा प्रयत्न असल्याचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांनी सांगितले, त्याचबरोबर पुढील काळात उरुळी कांचन शहराला स्वतंत्र उपकेंद्रातून वीज पुरवठा सुरू करणे, पुरंदर उपसा योजनेतून वीज पुरवठा करणे या कामांवर महावितरणचे विशेष लक्ष घालून पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. यावेळी कार्यकारी अभियंता माणिक राठोड,उप कार्यकारी अभियंता प्रवीण महामुलकर, सहाय्यक अभियंता संजय पोफळे, एच.डी.बागवान उपस्थित होते.
लोकप्रतिनिधी गुंतले प्रचारात !
हवेलीत महावितरणच्या प्रश्नासहीत अनेक समस्यांनी ग्रासले आहेत. परंतु लोकप्रतिनिधींनी चे नागरी समस्याकडे लक्ष आहे, की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रत्येक वेळी हवेली तालुक्यात प्रश्न पत्रकारांनी मांडायचे, सोडवयाचे परंतु लोकप्रतिनिधी म्हणून समस्या उत्पन्न होईपर्यंत दुर्लक्ष होत
असल्याची नागरीकांची ओरड आहे. लोकप्रतिनिधींना नागरी प्रश्नांपेक्षा निवडणूकीच्या कामांत अधिक रस असल्याचे नागरिक आता संतापाने बोलु लागले आहेत.