Pandharpur : पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून तब्बल ३१४ सोने-चांदीचे दागिने गायब?, धक्कादायक माहिती आली समोर…

Pandharpur : पंढरपूर : तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील पुरातन आणि मौल्यवान सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच महाराष्ट्रातील जागृत अशा विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात असाच काहीसा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक अॅड. सुनील घनवट यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कारभारावर धक्कादायक आरोप केले आहेत. एसआयटी नेमून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कारभाराची चौकशी करा, अशी मागणी सुनील घनवट यांनी केली आहे. Pandharpur
श्री विठ्ठलाचे २०३ आणि रुक्मिणी मातेच्या १११ दागिन्यांची नोंद ताळेबंदामध्ये दिसून येत नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र मंदिर महासंघ आक्रमक झालं आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी मंदिर महासंघाने केली आहे. लेखापरीक्षकांना रजिस्टर दाखवले नाही तर लेखा परीक्षण का केले? असा सवाल करण्यात आला आहे.

आम्हाला ३१५ दागिने दिले नाहीत असं लेखापरीक्षकांचा अभिप्राय आहे. दागिने सील करून ठेवले जात नाहीत. दागिने सील न केल्याने दागिने गायब करण्याला किंवा बदलण्याला वाव मिळतो. देणगी मोजताना बाहेर सुरक्षा रक्षक नेमला नाही, असा आरोप महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी केला आहे.
दरम्यान, देणगीसाठी आयकर विभागाचा ८० जीचा नोंदणी नंबर कायमस्वरूपी न घेता देणगी घेतली जाते, असंही त्यांनी नमूद केले आहे. तसेच भक्त निवासमधील हॉटेलला काम सुरु करण्याचा परवानाच दिला नसताना हॉटेल सुरु आहे. हॉटेल मध्ये भाविकांची आर्थिक लूट होत आहे’, असा आरोप महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.