मोदी सरकारने तब्बल ४०० वस्तूंवरील GST केला कमी, सर्वसामान्यांना कसा होणार फायदा? वाचा सविस्तर…

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जवळपास ४०० वस्तू आणि सेवांवरील जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) दरांमध्ये मोठी कपात जाहीर केली आहे. यामुळे अनेक वस्तूंच्या किमती कमी होणार असून ग्राहकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. आता कंपन्या २२ सप्टेंबरच्या अंमलबजावणीच्या तारखेपर्यंत किमती बदलून ग्राहकांना या कपातीचा फायदा देण्याच्या तयारीत आहेत.

यामध्ये टीव्ही, एसी, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनसारख्या ‘व्हाइट गुड्स’ कंपन्या या बदलांमुळे सकारात्मक आहेत. या वस्तूंवरील जीएसटी २८% वरून १८% पर्यंत कमी झाल्यामुळे कंपन्यांना मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या डीलर्सना जुन्या दराने बिल केलेल्या न विकलेल्या साठ्याचे नुकसान आपण भरून काढू, असे सांगितले आहे.
याबाबत कंपन्या आणि उद्योग तज्ज्ञांशी संवाद साधून विविध क्षेत्रांमध्ये जीएसटी कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत कसा पोहोचवला जाणार आहे, हे सांगितले आहे. उत्पादन आणि वितरणाच्या अनेक टप्प्यांवर कर लागू होतो. कंपन्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर भरलेल्या जीएसटीसाठी ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ मिळवतात.

असे असताना मात्र, एकदा वस्तूंचे उत्पादन झाले आणि त्याचे बिल तयार झाले की, विक्रीच्या वेळेनुसार जीएसटीचा दर निश्चित होतो. म्हणजेच २२ सप्टेंबरपूर्वी डीलर्सकडे पाठवलेल्या वस्तूंवर जुन्या कर दराची किंमत असते. या किमतींमध्ये मध्येच बदल करण्यासाठी उत्पादक, वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांमध्ये समन्वय साधणे आवश्यक आहे.
ट्रेड प्रमोशन्स व योजना नव्याने आखाव्या लागतील. कंपन्यांना ERP सिस्टीम, बिलिंग सॉफ्टवेअर आणि पॉईंट-ऑफ-सेल टर्मिनल्स अपडेट करावे लागतील. मोठ्या व्यापाऱ्यांना हे बदल करणे सोपे असले तरी लहान दुकाने आणि पारंपरिक किराणा दुकानदारांना वेळेत सिस्टीम अद्ययावत करण्यात अडचणी येऊ शकतात.
या बदलाचा उद्देश अंतिम ग्राहकाला फायदा पोहोचवणे हा आहे. ही सुधारणा ग्राहकाभिमुख दृष्टिकोनातून लागू करण्यात आली आहे. जीएसटी, जो ग्राहकाने भरलेल्या किमतीमध्ये समाविष्ट असतो, तो थेट फायदा देण्यासाठी पुन्हा बदल केला जात आहे. आता येणाऱ्या काळात हॉटेल, विमान प्रवास, विमा यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होऊ शकतो.