शिंदे-फडणवीस सरकारवर आठवलेंची नाराजी…!

महाबळेश्वर : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुकांमध्ये आपल्याला भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेसोबत (शिंदे गट) राहायचे आहे. त्यांनी सुद्धा आपले नाव घेणे आवश्यक आहे. मात्र, भाजप व एकनाथ शिंदे यांच्याकडून रिपब्लिकन पक्षाचे नाव विशेष करून घेतले जात नाही. डावलले जात आहे, अशी खंत मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एकदिवसीय अभ्यास शिबिरात ते बोलत होते. आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही भाजप व शिंदे गटासोबत आहोत. वैचारिक मतभेद असले तरी आमचे सत्तेपर्यंत पोचण्याचे मिशन आहे.
सत्तेच्या माध्यमातून अनेक लोक भेटतात. त्यांची कामे होतात. त्यामुळे सत्ता आवश्यक आहे. मात्र, आपण चळवळीचे काम थांबवता कामा नये, चळवळ जिवंत ठेवली पाहिजे. दलित व आदिवासींना खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण मिळाले पाहिजे, यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. महत्त्वाच्या मागण्या व प्रश्नांवर राष्ट्रीय समितीमध्ये चर्चा करून दिशा ठरविण्याची गरज आहे.