महाराष्ट्रात आता ‘इतक्या’ वयापर्यंत नोकरी करता येणार, सरकारी नोकरीच्या नियमांमध्ये बदल, जाणून घ्या..

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून निवृत्तीनंतरही आता कर्मचारी वयाच्या ७० वर्षांपर्यंत नोकरी करू शकणार आहेत.

विशेष म्हणजे, त्यांना यासाठी दरमहा ८० हजार रुपयांपर्यंतचे आकर्षक वेतन मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून, सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने पुन्हा सेवेत घेता येणार आहे.
तसेच ५८ किंवा ६० व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर हे अधिकारी वयाच्या ६५ ते ७० वर्षांपर्यंत पुन्हा काम करू शकतील. यामुळे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा लाभ सरकारला मिळू शकणार आहे.

दरम्यान, या निर्णयाचा लाभ केवळ ‘अ’ आणि ‘ब’ गटातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनाच मिळणार आहे. मात्र, ‘क’ आणि ‘ड’ गटातील कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. तसेच, ज्या अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरु आहे, त्यांना देखील पुन्हा सेवेत घेण्यात येणार नाही.
राज्य सरकारच्या आस्थापनांमध्ये एकूण पदांपैकी १० टक्के पदे ही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. या अधिकाऱ्यांना मूळ निवृत्तीवेतनासोबत इतर भत्ते आणि दरमहा ८० हजार रुपयांपर्यंतचे वेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे.