एसटी प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ हॉटेल्सवर बसला थांबा नाही, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले महत्त्वाचे आदेश..

पुणे : एसटी प्रवाशांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. प्रवासादरम्यान एसटी बसला ठरवून दिलेले थांबे असतात. या थांब्यातील हॉटेलमध्ये बेचव आणि महाग जेवण प्रवाशांना दिले जाते. हे थांबे महिला प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीचे देखील ठरतात.
त्यामुळे अशा सर्व हॉटेल झाडाझडती होणार आहे. प्रवाशांना सकस आणि किफायतशीर जेवण मिळत नसेल तर अशा थांब्यांची तपासणी करुन ती रद्द करावेत असे आदेश परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
तसेच आता लांब पल्ल्याच्या एसटी बस प्रवाशांच्या खाण्यापिण्यासाठी, जेवणासाठी महामार्गावर ठराविक ठिकाणच्या हॉटेलांवर थांबे घेतले जातात. मात्र, तेथील खाद्यपदार्थ बऱ्याचदा निकृष्ट दर्जाचे आणि जास्त किमतीचे असल्याचे आढळून आले आहे.
दरम्यान, अशा हॉटेल वा मोटेल थांब्यांवरची सेवा चांगली नसल्यास ते थांबेच रद्द करा, असे निर्देश परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बस विविध हॉटेल-मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा-नाष्टा अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो.
परंतु अनेक हॉटेलमधील थांब्यांबाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून प्रामुख्याने प्रसाधनगृहे अस्वच्छ असणे, फराळाचे जिन्नस शिळे, अशुद्ध व महाग असणे, याचबरोबर संबंधित हॉटेल वरील कर्मचारी व मालकांची वर्तणूक एसटी प्रवाशांच्या सोबत अत्यंत वाईट असणे अशा प्रकारच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
दरम्यान, या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला याबाबत कडक धोरण स्वीकारण्याची निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता प्रवाशांशी असभ्य वर्तन आणि बाकी गोष्टी लक्षात ठेवून त्या हॉटेलचे थांबे आता रद्द करण्यात येणार आहेत.