दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेआधी बोर्डाने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या संपूर्ण माहिती…

पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या आगामी बोर्ड परीक्षांसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षी परीक्षा पंधरा दिवस लवकर सुरू होत आहेत. यासोबतच, परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी मंडळाने अत्यंत कठोर पावले उचलली असून, सर्व परीक्षा केंद्रांसाठी नवीन नियम लागू केले आहेत.

वेळापत्रकानुसार यंदा इयत्ता बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारीला सुरू होईल आणि १८ मार्च २०२६ ला परीक्षेची सांगता होणार आहे. तसेच दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीला सुरू होणार आहे आणि बारावी प्रमाणेच १८ मार्च रोजी संपणार आहे.

तसेच आता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत आधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी बोर्डाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.

परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. ‘सरमिसळ पद्धत’ (वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी एकत्र बसवणे) यावर्षीही कायम ठेवली जाणार आहे. यासोबतच, प्रत्येक परीक्षा केंद्रातील सर्व वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, केंद्राला पक्की संरक्षक भिंत असणेही अनिवार्य आहे.
दरम्यान, मागील वर्षी ज्या केंद्रांवर कॉपीचे प्रकार घडले होते, अशा केंद्रांची मान्यता यंदा रद्द केली जाणार आहे. १५ नोव्हेंबरपासून मंडळाकडून सर्व केंद्रांची पडताळणी सुरू होईल. सीसीटीव्ही, भिंत, स्वच्छतागृह या सुविधा नसलेल्या केंद्रांची मान्यता रद्द होईल. केंद्रांना सीसीटीव्ही बसवण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली जाईल आणि परीक्षेचे रेकॉर्डिंग ३० दिवसांसाठी जतन करणे बंधनकारक असेल.
