शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पेरणी नेमकी कधी करावी? कृषी विभागानं दिला महत्वाचा सल्ला..

पुणे : सध्या राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस झाल्यामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी शेतीच्या कामाकडे वळाले आहेत. याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला दिला आहे. जिथे जास्त पाऊस झाला आहे, त्याठिकाणच्या शेतकऱ्यांना थांबावं लागेल. जोपर्यंत वापसा येत नाही तोपर्यंत पेरणी करता येणार नाही अशी माहिती कृषी विभागानं दिली आहे.
जिथे जास्त पाऊस झाला आहे तिथं वापसा आल्यावर पेरणी करावी, असे सांगण्यात आले आहे. राज्यात मॉन्सून लवकर दाखल झाला आहे. 11 दिवस आधीच मॉन्सून दाखल झाला आहे. राज्यात 140 मिलिमीटर मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे. त्यामुळं वापसा होईपर्यंत शेतकऱ्यांनी थांबावं असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे.
काही भागांत हे प्रमाण अधिक असून जमिनी सतत ओलसर राहिल्यामुळे पेरणीसाठी योग्य वापसा अद्याप निर्माण झालेला नाही. राज्यात अनेक शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. मात्र, कृषी विभागाचे संचालक नाईकवाडी यांनी स्पष्ट सांगितले, पावसाचे प्रमाण लक्षात घेता शेतकऱ्यांनी घाईने पेरणी करू नये. वापसा तयार झाल्यावरच योग्य वेळ साधून पेरणी करावी.
दरम्यान, सध्या अतिपावसामुळे एकूण 34,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती देखील नाईकवाडी यांनी दिली. नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि ते पूर्ण झाल्यावर अहवाल राज्य शासनाला सादर केला जाईल, यामुळे याबाबत शेतकरी मदतीची मागणी करत आहेत.
राज्यात यंदा मान्सूनपूर्व पाऊस अपेक्षेपेक्षा लवकर आणि अधिक प्रमाणात झाल्याने अनेक भागांत शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी कालवे फुटले आहेत. वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे. यामुळे यंदा मोठा प्रमाणावर पाऊस असणार हे तज्ञांनी सांगितले आहे. अजूनही अनेक जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे.